अभियंत्यांचे दैवत – डॉ.विश्वेश्वरय्या स्वाध्याय इयत्ता नववी| Abhiyantyache daivat Swadhyay class 9 | std 9 | iyatta navvi
प्र. १. समर्पक उदाहरण लिहा.
(अ) विश्वेश्वरय्या यांनी घेतलेले कठोर परिश्रम –
उत्तर – विश्वेश्वरय्या यांनी स्वतःचे शिक्षण घेण्यासाठी शिकवण्या करून पैसे उभे केले.
(आ) माणुसकीचे दर्शन –
उत्तर – १९०७ साली विश्वेश्वरय्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. तत्कालीन मुंबई सरकारने सेवेचा गौरव म्हणून त्यांना पेन्शन दिली. त्या पेन्शनमधे स्वतःच्या गरजेपुरते पैसे ठेवून त्यांनी उरलेली रक्कम गरीब विदयार्थ्यांच्या शिक्षणासाठी शिक्षणसंस्थांच्या व उभारणीसाठी खर्च केली. प्रतिकूल परिस्थितीशी झुंजत शिक्षण घेणाऱ्यांना मदत व्हावी, म्हणून त्यांनी ही देणगी दिली, ही त्यांची, त्यांच्यातील माणुसकीचे दर्शन घडवणारी कृती होय.
प्र. २. खालील प्रत्येक वाक्यातून विश्वेश्वरय्या यांचा कोणता गुण प्रकट होताे ते लिहा.
(१) आवाजाची लय चुकल्याची जाणीव त्यांना झाली.
उत्तर – अचूक ज्ञान
(२) सफल जीवनासाठी शरीरापेक्षा मनाला महत्त्व देणे
उत्तर – सुखासीनता, विलास यांना महत्त्व न देण्याची वृत्ती.
(३) शिकवण्या करून त्यांनी पैसे उभे केले.
उत्तर – कष्टाळूपणा, जिद्द
(४) अभियांत्रिकी पदवी परीक्षेत मुंबई प्रांतात प्रथम आले.
उत्तर – बुद्धिमान
(५) वयाच्या नव्वदीतही तरुणांना लाजवेल एवढे उत्साही होते.
उत्तर – कार्यतत्परता
(६) सारी पेन्शन गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी खर्च केली.
उत्तर – सहानुभूती
प्र. ३. माहिती लिहा.
(१)विश्वेश्वरय्यांची अजरामर स्मारके
उत्तर –
मुसा नदीचा बंदोबस्त |
शिवसमुद्र धबडब्याजवळील विजकेंद्र |
कृष्णासगर धरण |
विश्वेश्वरय्या कालवा |
(२)विश्वेश्वरय्या यांनी भूषवलेली विविध पदे
नवी दिल्ली राजधानी समितीचे सल्लागार |
भारतीय अर्थविषयक समितीचे अध्यक्ष |
महहेसुरचे दिवाण |
मुंबई महानगरपालिका काटकसर समितीचे अध्यक्ष |
प्र. ४. खालील शब्दांच्या अर्थांतील फरक समजून घ्या व त्यांचा स्वतंत्र वाक्यांत उपयोग करा.
(अ) आव्हान-आवाहन
उत्तर – आव्हान आवाहन प्रतिस्पर्ध्याला लढाईला किंवा वादाला बोलावणे. एखादे चांगले काम करण्यासाठी बोलावणे.
वाक्ये –
आव्हान – भैरू पहिलवानाने कुस्तीसाठी केरू पहिलवानाला आव्हान दिले.
आवाहन – पंतप्रधानांनी जनतेला स्वच्छता अभियानात सामील होण्याचे आवाहन केले.
(आ) कृतज्ञ-कृतघ्न
उत्तर –
कृतज्ञ – उपकाराची जाणीव असणारा.
कृतघ्न – केलेले उपकार विसरणारा.
वाक्ये :
कृतज्ञ – सीमेवर रक्षण करणाऱ्या जवानांबद्दल जनतेने कृतज्ञ राहिले पाहिजे.
कृतघ्न – आपल्याला मदत करणाऱ्यांशी आपण कृतघ्न होऊ नये.
(इ) आभार-अभिनंदन
उत्तर –
आभार धन्यवाद (देणे).
अभिनंदन – शाबासकी (देणे), कौतुक (करणे). वाक्ये : आभार – स्नेहसंमेलनाला उपस्थित राहिलेल्या प्रमुख पाहुण्यांचे प्राचार्यांनी आभार मानले.
अभिनंदन – पोहण्याच्या स्पर्धेत मिताली प्रथम आली; म्हणून मॅडमनी तिचे अभिनंदन केले.
(ई) विनंती-तक्रार
उत्तर –
विनंती – विनवणी करणे.
तक्रार – गाऱ्हाणे मांडणे.
वाक्ये :
विनंती – कार्यक्रमात निवेदकाने अध्यक्षांना
स्थानापन्न होण्याची विनंती केली.
तक्रार – सदाशिवरावांनी परिसरातील अस्वच्छतेविषयी आरोग्य अधिकाऱ्यांकडे तक्रार केली.
प्र. ५. खालील वाक्याचा मराठी भाषेत अनुवाद करा.
He is an engineer of integrity, character and broad outlook.
उत्तर – ते (विश्वेश्वरय्या) निष्ठावान, चारित्र्यसंपन्न व विशाल दृष्टिकोन असलेले अभियंता आहेत.
प्र. ६. स्वमत.
(अ) ‘विश्वेश्वरय्यांच्या दीर्घ जीवनाच्या पंचसूत्रीतून तुम्हांला होणारा बोध लिहा.
उत्तर : सुनियंत्रित आचरण, कठोर परिश्रम, प्रसन्नता, संयम व प्रचंड आशावाद ही विश्वेश्वरय्यांच्या दीर्घ जीवनाची पंचसूत्री होती. या सूत्रांना अनुसरून जगल्यास कोणतीही व्यक्ती अत्यंत समाधानी व यशस्वी आयुष्य जगू शकेल.
सुनियंत्रित आचरण म्हणजे कसेही भरकटलेले जीवन न जगता आपल्या ध्येयाला अनुसरून प्रत्येक कृती करणे, त्यासाठी काटेकोर नियोजन केले पाहिजे. कठोर परिश्रमांची तयारी ठेवली पाहिजे. आपले मन आपल्याला सुखासीनतेकडे ओढत राहते. त्याची अजिबात पर्वा करता कामा नये. त्याचबरोबर आपल्या मनाची प्रसन्नता ढळता कामा नये. मन प्रसन्न राखल्यामुळे जीवन जगण्याची शक्ती वाढते, संयम हा सुद्धा एक मोलाचा गुण आहे. अनेक बाबतींत आपले मन अनेक दिशांनी धावते. वासना-विकारांनी प्रभावित होते. अशा वेळी संयमाची नितांत गरज असते. अशा रितीने जगत असताना आपल्या निष्ठा ठाम हव्यात. आपल्या आयुष्यात चांगलेच घडणार, हाती घेतलेले प्रत्येक कार्य यशस्वीच होणार, अशी खात्री बाळगली पाहिजे. हा आशावाद आपल्याला तारून नेतो. विश्वेश्वरय्यांच्या पंचसूत्रीचा हा बोध घ्यानी बाळगल्यास आपले जीवन सुखी, संपन्न होईल.
(आ) ‘स्वप्नातही दिसणार नाही असे जलामृत आपल्या अंगणात आलेले पाहून सक्करकरांच्या डोळ्यांत आनंदाचे पाणी आले’, या वाक्याचा भावार्थ स्पष्ट करा.
उत्तर: सक्कर शहराचे नागरिक मोठ्या संकटात सापडले होते. सक्कर हे सिंधू नदीच्या काठी वसलेले एक शहर या शहरातील “नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी म्हणून नगरपालिकेने सिंधू नदीच्या काठावरील एका डोंगरावर जलाशय बांधला. सिंधू नदीचे पाणी पंपाने उचलून ते जलाशयात साठवले जाऊ लागले. तिथून पाईपांनी सक्करवासीयांना पुरवले जाऊ लागले. पण घरात पोहोचलेले पाणी वाळूमिश्रित, गढूळ व घाणेरडे होते. ते पाणी पाहून नागरिक दुःखीकष्टी होत. जलाशयात जमा होणारे पाणी संपूर्णपणे गाळून शुद्ध करणे आवश्यक होते. मात्र, त्या प्रक्रियेला येणारा खर्च अवाढव्य होता आणि तो नगरपालिकेला झेपणारा नव्हता. म्हणजे नागरिकांच्या नशिबी हेच घाणेरडे पाणी होते.
तेवढ्यात विश्वेश्वरय्यांनी हे आव्हान स्वीकारले. त्यांनी नदीतच विहीर खोदली. नदीचे पात्र व विहिरीचा तळ यांना जोडणारा बोगदा बांधला. मग विहिरीत नैसर्गिक रितीने स्वच्छ झालेले पाणी जमा होऊ लागले. विहिरीतले हे पाणी लोकांना मिळू लागले. हे अमृतासारखे स्वच्छ, शुद्ध पाणी पाहून सक्करकरांचे डोळे आनंदाने पाणावले. अशक्य असलेली गोष्ट विश्वेश्वरय्यांमुळे शक्य झाली, ही कृतज्ञताही त्या अश्रूंमध्ये होती.
(इ) विश्वेश्वरय्यांमधील तुमच्यावर प्रभाव टाकणाऱ्या गुणविशेषांचे तुमच्या शब्दांत वर्णन करा.
उत्तर : विश्वेश्वरय्या हे जगविख्यात अभियंता होते. अनेक गुणांमुळे ते जागतिक कीर्ती मिळवू शकले. त्यांच्या अनेक गुणांपैकी एक गुण मला खूप आकर्षून घेतो. समोर उभ्या ठाकलेल्या कोणत्याही समस्येला ते सर्व ताकदीनिशी सामोरे जायला सदोदित तत्पर असत. त्यांचा हा गुण मला खूप आवडतो. त्यांच्या या गुणामुळे त्यांच्याकडे गुंतागुंतीच्या व क्लिष्ट समस्या चालत आल्या. प्रत्येक समस्येच्या सोडवणुकीचा मार्ग भिन्न होता, योजलेले उपाय भिन्न होते. प्रत्येक ठिकाणी केलेले कार्य नावीन्यपूर्ण होते. त्यात त्यांची अभियांत्रिकी प्रतिभा दिसते. सगळी बुद्धी पणाला लावून ते काम करीत. या त्यांच्या गुणामुळेच त्यांच्याकहून अलौकिक कार्ये पार पडली. प्रत्येकाने हा गुण अंगी बाळगला पाहिजे, मग आपापल्या आयुष्यात माणसे यशस्वी होतील. जीवनातला श्रेष्ठ आनंद त्यांना लाभेल.
(ई) ‘झिजलात तरी चालेल पण गंजू नका’, या विचारातून तुम्हांला मिळालेला संदेश सविस्तर लिहा.
उत्तर : पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ‘निष्ठावान अभियंता’ हे उद्गार विश्वेश्वरय्यांना उद्देशून काढले, ते अक्षरश: सत्य आहेत. ते बुद्धिमान होते. त्यांची बुद्धीवर विलक्षण निष्ठा होती. कार्यावर निष्ठा होती. म्हणूनच ते म्हणतात, ‘झिजलात तरी चालेल पण गंजू नका.’ याचा अर्थ स्वतःच्या कार्यासाठी वाटेल ते कष्ट घेण्याची तयारी ठेवली पाहिजे. आराम करण्याची, कष्ट टाळण्याची वृत्ती त्यांना अजिबात मान्य नव्हती. आपण आपले जे कार्यक्षेत्र निवडले आहे, त्यात झोकून दिले पाहिजे. आपली सर्व शक्ती पणाला लावली पाहिजे. मग उत्तुंग यश मिळणारच. सतत काम करीत राहण्याने बुद्धी गंजत नाही. बुद्धी गंजली की माणूस संपलाच. बुद्धी सतत सतेज राखली पाहिजे, हेच विश्वेश्वरय्यांना सांगायचे आहे.