धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज- मुघलांचा कर्दनकाळ त्यांचाबद्दलच्या या गोष्टी माहीत आहे का तुम्हाला ?
बालपनापासून दुः ख:
14 मे 1657 हा दिवस महाराष्ट्र तसेच भारतीय इतिहासातील सर्वात महत्त्वाचा दिवस आहे. कारण ह्या दिवशीच किल्ले पुरंदर येथे एका महान राजाचा जन्म झाला ज्याने कायम रयतेच्या सुखाचा विचार केला व इतिहासात मुघलांचा कर्दनकाळ म्हणुन नावारुपास आला.
संभाजी महाराजांना अगदी लहान असल्यापासून दुःख सोसावं लागलं. संभाजी राजे दोन वर्षांचे असताना सईबाईंचे अकाली निधन झाले. त्यानंतर त्यांचा सांभाळ आजी राजमाता जिजाऊंनी केला. केशवभट आणि उमाजी पंडित यांनी संभाजी राजेंना उत्तम शिक्षण दिलं. सुरुवातीच्या काळात त्यांची सावत्र आई सोयराबाई यांनीही त्यांच्यावर खूप माया केली. लहान असल्यापासूनच संभाजी महाराजांनी राजकारणातील डावपेच, गनिमी कावा अगदी भराभर आत्मसाद केले व त्यांच्याआधारे सुमारे 120 युद्धे जिंकली व औरंगजेबाच्या नाकी नऊ आणून सोडले.

सुरुवातीपासुनच औरंगजेबाशी लढा. (आग्रा मोहीम)
छत्रपती शिवाजी महाराज आग्रा मोहिमेवर गेले असताना त्यांनी संभाजी राजेंनाही सोबत नेलं होतं. त्यावेळी संभाजी राजे बालवयात म्हणजे अवघ्या नऊ वर्षांचे होते. छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून सुटल्यानंतर त्यांनी संभाजी महाराजांना मथुरेत ठेवले होते. संभाजी राजेंवर सुरक्षित स्वराज्यात आणण्यासाठी संभाजी राजेंचे निधन झाल्याची अफवा महाराजांनी पसरवून दिली. त्यानंतर 20 नोव्हेंबर 1666 रोजी अगदी सुखरूपपणे ते पुन्हा राजगडास पोहोचले.
बुधभूषण – एक ऐतिहासिक ग्रंथ.
संभाजी महाराज एक महान विद्वान होते याचा पुरावा देणारा ग्रंथ महणजे बुधभूषण. संभाजी राजेंनी वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी बुधभूषण हा ग्रंथ लिहिला. तीन भागांतील बुधभूषण या ग्रंथात काव्यालंकार, शास्त्रे, संगीत, पुराणे, धनुर्विविद्या यांचा अभ्यास केल्याचा उल्लेख आहे. तसेच राजा आणि त्याचे गुण, राजाचे मदतनीस, राजाचे सल्लागार, राजाची कर्तव्ये, राजसभा, मुख्य प्रधान राजपुत्र, त्यांचे शिक्षण, त्यांची कर्तव्ये, कोश, दुर्ग, सैन्य, हेर, नोकर, वगैरेंची माहिती दिली आहे.यावरून समजते की संभाजी महाराज साधे सुधे राजे नसुन लोककल्याणकारी राजे होते.
महान योद्धा
छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्या पराक्रमाच्या जोरावर कमी कालावधीत मराठा साम्राज्याचा विस्तार केला. मराठा साम्राज्याच्या 15 पट असणाऱ्या मुघल साम्राज्याशी संभाजी महाराजांनी एकहाती लढा दिला. संभाजी महाराजांनी गनिमी कावा पुरेपूर वापरत औरंगजेबाला पुरते जेरीस आणले होते. संभाजी राजेंनी आपल्या कार्यकाळात एकूण 120 युद्धे लढली. महत्वाचे म्हणजे या एकाही लढाईत त्यांना अपयश आले नाही. असा पराक्रम करणारे छत्रपती संभाजी महाराज हे एकमेव योद्धा होते.
अजरामर हुतात्मा
1689 च्या सुरवातीला छत्रपती संभाजी राजेंचा मेहुणा गणोजी शिर्के आणि औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान यांनी संगमेश्वरवर हल्ला केला. मराठ्यांत आणि शत्रूचे सैन्यात चकमक झाली. मराठ्यांचे संख्याबळ कमी होते. प्रयत्नांची शर्थ करूनही मराठे शत्रूचा हल्ला परतवून लावू शकले नाहीत. परिणामी शत्रूने संभाजी महाराजांना जिवंत पकडण्यात मोघलांना यश आले.
संभाजीराजे आणि कवी कलश यांना औरंगजेबापुढे बहादुरगड येथे नेले. संभाजीराजांनी धर्मांतर केल्यास जीवदान देण्याची अट औरंगजेबाने घातली होती. मात्र, संभाजी राजेंनी त्याला स्पष्टपणे नकार दिला.त्यामुळे राजे रात्र न् दिवस वेदना सहन करत राहिले पण झुकले नाही.
औरंगजेबाचे अनन्वित अत्याचार असह्य होऊन सुमारे 40 दिवसांनी फाल्गुन अमावास्या म्हणजेच 11 मार्च 1689 रोजी संभाजी महाराजांची प्राणज्योत अखेर मालवली. असह्य यातना सहन करूनही संभाजीराजांनी स्वराज्यनिष्ठा आणि धर्मनिष्ठा सोडली नाही.