५. नैसर्गिक वनस्पती व प्राणी
प्रश्न १. पाठात दिलेली माहिती, आकृत्या व नकाशे यांच्या आधारे तक्त्यातील माहिती भरा.
५. नैसर्गिक वनस्पती व प्राणी
उत्तर:
अ.क्र. | वनांचा प्रकार | गुणधर्म | भारतातील प्रदेश | ब्राझीलमधील प्रदेश |
१. | उष्ण कटिबंधीय वने | रुंदपर्णी सदाहरित वृक्ष | अंदमान आणि निकोबार बेटे, पश्चिम घाट, असम इत्यादी. | गियाना उच्चभूमी व ॲमेझॉन नदीचे खोरे |
२. | निम वाळवंटी काटेरी वने | (१) वनस्पतींची पाने आकाराने लहान. (२) कमी उंचीच्या वनस्पती. | गुजरात, राजस्थान. | ब्राझीलमधील ईशान्य भागातील पर्जन्यछायेचा प्रदेश शुष्क (अवर्षण चतुष्कोन) |
३. | ‘सॅव्हाना’ | तुरळक झुडपांसारखी झाडे/तुरळक झुडपे व अवर्षण प्रतिकारक गवत | राजस्थानमधील वाळवंटी प्रदेश.
| ब्राझीलची उच्चभूमी |
४. | उष्ण कटिबंधीय निम पानझडी | मिश्र स्वरूपाच्या वनस्पती | पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशा, मध्य प्रदेश इत्यादी. | पॅराग्वे-पॅराना नद्यांच्या खोऱ्यांचा प्रदेश
|
५. | गवताळ प्रदेश | अर्जेंटिनामधील गवताळ प्रदेश ‘पंपास ‘ प्रमाणे | हिमाचल प्रदेश, हरियाणा, उत्तराखंड, बिहार, पश्चिम बंगाल, असम (तराई प्रदेश). | ब्राझीलचा अतिदक्षिणेकडील प्रदेश |
प्रश्न २. वेगळा घटक ओळखा.
(५. नैसर्गिक वनस्पती व प्राणी )
(अ) ब्राझीलमधील वनप्रकार-
(i) काटेरी झुडपी वने (ii) सदाहरित वने
(iii) हिमालयीन वने (iv) पानझडी वने
उत्तर – (iii) हिमालयीन वने
(आ) भारताच्या संदर्भात-
(i) खारफुटीची वने (ii) भूमध्य सागरी वने
(iii) काटेरी झुडपी वने (iv) विषुववृत्तीय वने
उत्तर – (iv) विषुववृत्तीय वने
(इ) ब्राझीलमधील वन्य प्राणी-
(i) अॅनाकोंडा (ii) तामरिन
(iii) मकाऊ (iv) सिंह
उत्तर – (iv) सिंह
(ई) भारतीय वनस्पती-
(i) देवदार (ii) अंजन
(iii) ऑर्किड (iv) वड
उत्तर – (iii) ऑर्किड
प्रश्न ३. जोड्या जुळवा.
(अ) सदाहरित वने (i) सुंद्री
(आ) पानझडी वने (ii)पाइन
(इ) समुद्रकाठची वने (iii) पाव ब्राझील
(ई) हिमालयीन वने (iv) खेजडी (v) साग
(उ) काटेरी व झुडपी वने (vi) आमर (vii)साल
उत्तरे –
(अ) सदाहरित वने – (iii) पाव ब्राझील
(आ) पानझडी वने – (v) साग
(इ) समुद्रकाठची वने – (i) सुंद्री
(ई) हिमालयीन वने – (ii)पाइन
(उ) काटेरी व झुडपी वने – (iv) खेजडी
प्रश्न ४. थोडक्यात उत्तरे द्या.
(अ) ब्राझील व भारतातील नैसर्गिक वनप्रकारातील फरक सांगा.
उत्तर : ब्राझील व भारतातील नैसर्गिक वनप्रकारांतील फरक पुढीलप्रमाणे आहे :
(अ) वर्षावने : (१) ब्राझील देशाच्या विषुववृत्ताजवळील उत्तर भागात वर्षभर भरपूर पाऊस व सूर्यप्रकाश पडतो. त्यामुळे ब्राझीलच्या उत्तर भागात घनदाट व सदाहरित वर्षावने आढळतात.
(२) भारताचे स्थान विषुववृत्तापासून लांब आहे. त्यामुळे ब्राझीलमध्ये आढळणारी वर्षावने भारतात आढळत नाहीत…
(ब) हिमालयीन वने : (१) भारताच्या उत्तर भागात हिमालय पर्वतरांगात अतिउंच प्रदेशांत हंगामी फुलझाडे असणारी वने, मध्यम उंचीवरील प्रदेशांत पाईन, देवदार, फर, स्प्रूस अशा सूचिपर्णी वृक्षांची वने व पायथ्यालगत मिश्र वने आढळतात.
(२) ब्राझील देशात अतिउंच व बर्फाच्छादित पर्वत आढळत नाहीत. त्यामुळे भारतात आढळणारी हिमालयीन वने ब्राझीलमध्ये आढळत नाहीत.
(आ) ब्राझील आणि भारतातील वन्य प्राणीजीवन व नैसर्गिक वनस्पती यांचा सहसंबंध स्पष्ट करा.
उत्तर : (१) नैसर्गिक वनस्पती हे तृणभक्षक प्राण्यांचे व पक्ष्यांचे खाद्य असते. तृणभक्षक प्राणी हे मांसभक्षक प्राण्यांचे खादय असते.
(२) विशिष्ट प्रकारचे नैसर्गिक खादय असणाऱ्या वनस्पती ज्या प्रदेशात आढळतात, त्या प्रदेशात तृणभक्षक प्राणी व पक्षी मोठ्या संख्येने आढळतात. परिणामी, अशा प्रदेशांत मांसभक्षक प्राणीही मोठ्या संख्येने आढळतात.
(३) उदा., ब्राझीलच्या गवताळ प्रदेशात गवतात चरणारी विविध जातींची हरणे आढळतात व हरणांची शिकार करणारे बिबटे मोठ्या संख्येत आढळतात.
(४) उदा., भारतातील गवताळ प्रदेशात विविध प्रकारचे कीटक आढळतात व या कीटकांचे भक्षण करणारे माळढोक पक्षी आढळतात.
(इ) ब्राझील व भारताला कोणत्या पर्यावरणीय समस्यांना तोंड द्यावे लागते?
उत्तर : ब्राझीलला व भारताला पुढील पर्यावरणीय समस्यांना तोंड दयावे लागत आहे :
(१) वाढत्या लोकसंख्येच्या निवासासाठी, इंधनासाठी व स्थलांतरित शेतीसाठी दोन्ही देशांत मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात येत आहे. त्यामुळे दोन्ही देशांना निर्वनीकरण समस्येला सामोरे जावे लागत आहे.
(२) दोन्ही देशांतील वाढत्या नागरीकरणामुळे प्रदूषणाच्या समस्येत वाढ झाली आहे.
(३) वाढते प्रदूषण, निर्वनीकरण इत्यादी कारणांमुळे दोन्ही देशांना पर्यावरणाच्या -हासाच्या समस्येला तोंड दयावे लागत आहे.
(४) पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे दोन्ही देशांतील विविध प्रजातींच्या वनस्पती, प्राणी व पक्षी यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
(ई) ब्राझील व भारतामधील वनांचा ऱ्हास होण्याची कारणे कोणती?
उत्तर : ब्राझील व भारतातील वनांचा न्हास होण्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत :
(१) भारत व ब्राझील या दोन्ही देशांत वाढत्या लोकसंख्येला निवासासाठी जागा अपुरी पडत आहे.
(२) निवासासाठी जागा उपलब्ध व्हावी यासाठी दोन्ही देशांत मोठ्या प्रमाणावर झाडे तोडली जातात.
(३) ब्राझीलमध्ये ‘रोका’ आणि भारतात ‘झूम’ यांसारख्या स्थलांतरित शेतीसाठी वनांखाली असलेली जमीन वृक्षतोड करून किंवा जाळून • शेतीसाठी व अधिवासासाठी मोकळी केली जाते.
(४) लोकांच्या इंधनाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वनांतील झाडे तोडली जातात.
(उ) भारताचा सर्वाधिक भाग पानझडी वनांनी का व्यापला आहे?
उत्तर : (१) कोरड्या ऋतूत (उन्हाळ्यात) बाष्पीभवनाने पाणी कमी होऊ नये म्हणून या पानझडी वनांतील वनस्पतींची पाने गळतात.
(२) पाने गळून गेल्यामुळे बाष्पीभवनाचा वेग कमी होतो व वनस्पतींचा जीवनकाळ वाढतो. (३) १००० मिमी ते २००० मिमी पर्जन्याच्या प्रदेशात प्रामुख्याने पानझडी वने आढळतात.
(४) भारतातील बहुतांश भागातील सरासरी पर्जन्याचे प्रमाण १००० मिमी ते २००० मिमी आहे. त्यामुळे भारताचा सर्वाधिक भाग पानझडी वनांनी व्यापला आहे.
प्रश्न ५. भौगोलिक कारणे लिहा.
(अ) ब्राझीलचा उत्तरभाग घनदाट वनांनी व्यापला आहे.
उत्तर : (१) ब्राझील देशाच्या उत्तर भागात अॅमेझॉन नदीच्या खोऱ्यात वार्षिक सरासरी पर्जन्याचे प्रमाण सुमारे २००० मिमी असते व या भागातील वार्षिक सरासरी तापमान सुमारे २८° से असते.
(२) अशा प्रकारे, ब्राझील देशाच्या उत्तर भागात सर्वसाधारणपणेवर्षभर भरपूर पाऊस व सूर्यप्रकाश पडतो.
(३) या भागात वनस्पतींची वाढ झपाट्याने होते व वनस्पतींचा जीवनकाळही मोठा असतो. त्यामुळे ब्राझीलचा उत्तर भाग घनदाट अरण्यांनी व्यापला आहे.
(आ) हिमालयाच्या उंच भागात वनस्पतींची संख्या विरळ आढळते.
उत्तर : (१) हिमालयाच्या उंच भागात तापमान अतिशय कमी •असते. काही ठिकाणी तापमान ° सेपेक्षाही कमी आढळते. हिमालयात उंच भागात सर्वत्र बर्फाचे थर आढळतात.
(२) अतिथंड हवामान व बर्फाचे थर यांमुळे हिमालयात वनस्पतींची मोठ्या प्रमाणात वाढ होत नाही.
(३) उन्हाळ्यात हिमालयातील तापमान तुलनेने अधिक असते व या प्रदेशातील बर्फही वितळू लागते. त्यामुळे हिमालयात उन्हाळ्यात हंगामी फुलझाडे उगवतात, परंतु हिवाळ्यात या वनस्पतींचा नाश होतो. अशा प्रकारे, हिमालयाच्या उंच भागात वनस्पतींची संख्या विरळ असते.
(इ) ब्राझीलमध्ये कृमी कीटकांची संख्या जास्त आहे.
उत्तर : (१) कृमी व कीटक हे प्रामुख्याने घनदाट वनांत, गवताळ प्रदेशात तसेच दलदलीच्या प्रदेशात आढळतात.
(२) झाडांची पाने, गवत, फुलांमधील रस इत्यादी कृमी व कीटकांचे खादय असते.
(३) ब्राझील देशात उत्तर भागात घनदाट वर्षावने, पॅराग्वे-पॅराना नद्यांच्या खोऱ्यांच्या प्रदेशांत गवताळ प्रदेश आणि पँटनाल येथे दलदलीचे प्रदेश आढळतात. त्यामुळे ब्राझीलमध्ये कृमी-कीटकांची संख्या जास्त आहे.
(ई) भारतातील वन्य प्राण्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे.
उत्तर : (१) भारतातील वाढत्या लोकसंख्येच्या निवासाच्या व इंधनाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जात आहे. भारतातील वाढत्या निर्वनीकरणामुळे प्राण्यांच्या अधिवासास धोका निर्माण झाला आहे.
(२) भारतात नागरीकरणाचा वेग झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे भारतातील विविध प्रकारच्या प्रदूषणांचे प्रमाण वाढले आहे. प्रदूषणामुळे प्राण्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.
(३) भारतात प्राण्यांची शिकार व बेकायदेशीर तस्करी या समस्या वाढत आहेत. भारतात ‘झूम’सारख्या स्थलांतरित शेतीसाठी मोठ्या संख्येने वृक्षतोड करून किंवा झाडे जाळून वनांचा प्रदेश मोकळा केला जात आहे. त्यामुळे भारतातील वन्य प्राण्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे.
(उ) भारताप्रमाणे ब्राझीलमध्येही प्राणी व वनसंवर्धनाची गरज आहे.
उत्तर : (१) भारताप्रमाणे ब्राझीलमध्येही वाढत्या निर्वनीकरणामुळे प्राण्यांच्या अधिवासास धोका निर्माण झाला आहे. भारताप्रमाणेच ब्राझीलमध्येही नागरीकरणाचा वेग झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे ब्राझीलमध्ये विविध प्रकारच्या प्रदूषणांचे प्रमाण वाढले आहे. प्रदूषणामुळे प्राण्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.
(२) भारताप्रमाणेच ब्राझील देशातही प्राण्यांची शिकार व बेकायदेशीर तस्करी यांचे प्रमाणही जास्त आहे. भारतातल्या ‘झूम’सारख्या स्थलांतरित शेतीप्रमाणेच ब्राझीलमध्ये ‘रोका’ या स्थलांतरित शेतीसाठी मोठ्या संख्येने वृक्षतोड करून किंवा झाडे जाळून वनांचा प्रदेश मोकळा केला जात आहे.
(३) या समस्यांमुळे भारतातील वन्य प्राण्यांच्या घटत्या संख्येप्रमाणेच ब्राझीलमधील प्राण्यांची संख्याही दिवसेंदिवस कमी होत आहे. दोन्ही देशांत प्राण्यांच्या काही जाती दुर्मीळ होत आहेत. काही प्रजाती पूर्णपणे नष्ट झाल्या आहेत. त्यामुळे प्राण्यांच्या प्रजातींच्या रक्षणाच्या दृष्टिकोनातून भारताप्रमाणे ब्राझीलमध्येही प्राणी संवर्धनाची गरज आहे.